जैन धर्मीय तत्वज्ञान , दहशतवाद निर्मुलनावर जालीम प्रभावी उपाय
जैन धर्मीय तत्वज्ञान , दहशतवाद निर्मुलनावर जालीम प्रभावी उपाय
संकलन : शिरीषजी बेगडे, अहिल्यानगर
११ सप्टेंबर २००१, स्थळ अमेरीकेतील न्युर्याक शहर, वेळ सकाळी साधारण ८.३० ची आसमंतात चार विमाने झेपावली त्यातील एक विमान जागतिक बाजार केंद्राच्या दोन पैकी एका उत्तुंग इमारतीला धडकले, थोड्याच वेळात दुसरे विमान दुसऱ्या इमारतीवर धडकले. उरलेली दोन विमाने अमेरीकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पॅन्टागन इमारतीवर धडकले, आणि अमेरीकाच नाही तर संपूर्ण जग हादरले. ३००० हुन अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. दि . २६ सप्टेबर २००८, स्थळ मुंबई, सायकांळी सहा नंतर एक थरार सुरु झाला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, कामा हॉस्पीटल, टाईम्स ऑफ इंडीया कार्यालय, लिओपर्ड कॅफे येथे अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु झाला आणि अवघ्या काही तासात एकूण १९७ नागरिकांचा बळी गेला.
अमेरिकेच्या दुदैवी घटनेनंतर संपूर्ण विश्वाला “दहशतवादाची” जाणिव झाली, तसेच भारताच्या मुंबई हल्ल्यानंतर त्याची दाहकता, भीषणता भारतीयांना समजली. विश्वाच्या इतिहासाचे अवलोकन केले असता अशी दहशतवादाची अनेक उदाहरणे, घटनांचे स्मरण होते. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेला नरसंहार, वेगवेगळ्या हुकुमशहांनी केलेले अत्याचार, पारतंत्र्यात भारतीय नागरीकांवर इंग्रज शासनकर्त्यांनी केलते जुलम, असे अनेक.
सर्वसामान्य, निरपराधी, निष्पाप जीवांना वेठीस धरून आपली उद्दीष्ठे साध्य करण्यासाठी, शासन व्यवस्थेच्या विरोधात धमकी देणे, समाजात भीती, दरारा, दहशत निर्माण करण्याच्या हेतूने केलेली हिंसात्मक कृत्ये म्हणजेच “दहशतवाद” अशी व्याख्या करता येईल. दहशतवादाचा पाया ठरतो कट्टरता. हिच कट्टरता दैनंदिन जीवनात, सामाजिक जीवनात असु शकते, किंबहुना कट्टरता हे बीज असून दहशतवाद हे त्याचे अनिष्ठ फळ आहे. या दहशतवादाचे स्वरूप वेगवेगळे आहे. वैयक्तीक दहशतवाद, कौटुंबिक दहशतवाद, संघटीत दहशतवाद, वैयक्तीक दहशतवादाची उदाहरणे विविध आस्थापना, व्यवसायात आढळून येतात. एखादया कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचारी हेकेखोर असु शकतो की, त्याचे वर्तन दहशतवादी स्वरुपाचे ठरते. एखाद्या व्यक्तीचे त्याच्या कुटूंबात देखील हेकेखोर वर्तन असते की, त्याच्या अमलाखाली इतर कौटुंबिक सदस्य दडपण, भीतीच्या अमलाखाली वावरत असतात. अशा कट्टर, हेकेखोर व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे संघटन तयार होऊन संघटीत दहशतवादी कृत्ये घडु लागतात. हिंसात्मक कृत्ये, बळजबरी, धमक्या देणे, जनतेला ओलीस ठेवणे याचा वापर करून त्यांचे लक्ष साधणे हा हेतु असतो.
दहशतवादाच्या कारणांचा विचार केल्यास बेकारी, असहिष्णुता, दारिद्रय आर्थिक तफावत, असुरक्षिततेची भावना, संकुचित वृत्ती, सुसंवादाचा अभाव याबाबी महत्वाच्या ठरतात. वर्तमानकाळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे दहशतवादी व्यक्ती, संघटना यांना अत्याधुनिक शस्त्रे, आधुनिक दळणवळणाची साधने सहज उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग दहशतवाद पसरविण्यास अत्यंत प्रभावी ठरतो . जसे की इंटरनेट, मोबाईल, आधुनिक वाहने. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संरक्षणावरील खर्च वाढतो, विकासाची गती मंदावते, सामाजिक सुरक्षिततेची भावना धोक्यात येते, राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान होते, अनेक निरपराधी जीव बळी पडतात, अनेक कुटूंब उध्वस्त होतात.
जगातील शांतता प्रेमी राष्ट्रे व त्यांचे शासन या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सतत उपाययोजना करतात . तरी देखील ते प्रयत्न तोकडे पडतात अथवा कुचकामी ठरतात. दहशतवाद या भीषण समस्येचा एक प्रभावी उपाय आहे तो केवळ एकाच धर्मात आणि तो आहे फक्त जैन धर्म.
जैन धर्म जगातील प्राचीन धर्म असुन प्रथम तिर्थंकर श्री वृषभदेवांनी स्थापना केला आणि २४ वे अंतिम तिर्थकर श्री महावीर स्वामींनी तो जगापर्यंत पोहचवला. अर्थात “श्री वृषभदेवे रचिला पाया, वर्धमान झालासी कळस” जैन धर्माचे साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करून सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य श्री महावीर स्वामींनी केले. जैन धर्म श्रमण परंपरेचे पालन करतो, याच्या तत्वज्ञानाने, समता स्वातंत्र्य व न्याय या विचारांचा सतत पुरस्कार केला आहे “जगा व जगू द्या” या सिध्दांतावर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे. त्यातही “अनेकांतवाद” हा जैन धर्मातील महत्वाचा विचार आहे, की जो मानवीच नाही तर सर्व प्राणिमात्रांच्या
कल्याणाचा पुरस्कार करतो. विश्वातील सर्वांच्या कल्याणाचे अभिवचन याच अनेकांतवादातून प्रकट होते.
काय आहे हा अनेकांतवाद ? अनेक शब्दाचा अर्थ असंख्य आणि अंत चा अर्थ धर्म किंवा गुण असा आहे.
एकाच व्यक्तीत परस्पर विरोधी धर्म असतात असे सांगणारा अनेकांतवाद. अनेक गुणांना नाकारून एकाच गुणाचे अस्तीत्व, सत्यस्वरूप असु शकत नाही, तर सर्व संभवनीय दृष्टीने जाणणे हाच अनेकांतवाद आहे. एक व्यक्ती कुणाचा पुत्र , पिता, कुणाचा पती अथवा भाऊ असु शकतो, त्याचे वेगवेगळे स्वरूप दिसते, तथापी ती मुळतः एकच आहे, पित्याच्या नजरेतून पुत्र तर पत्नीच्या नजरेतुन पती. एका अपेक्षेने जे असते, ते दुसऱ्या अपक्षेने नसते. अशा प्रकारे अनेकांतवाद संशय निर्माण करणारा नाही तर यथार्थ धर्म सांगणारा आहे. तसेच ‘स्थाद्वाद’ हा जैनधर्मातील विचार सात विविध प्रकारे जीवाचे अथवा वस्तुचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतो. अनेकांतवाद हे जैन धर्माचे लक्ष असुन स्थाद्वाद हे त्यास प्राप्त करण्याचे साधन आहे.
जैन तत्वांनुसार जीव हा चैतन्य आहे आणि या जीवासाठी पाच प्रकारची “पंच महाव्रते” आहेत. “सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रम्हचर्य.” सत्याचा अर्थ वर्तन, कृती प्रामाणिक असणे, अहिंसेचा अर्थ मन, वचन व कायेद्वारे जीवाची हत्या न करणे, अस्तेय म्हणजे चोरी, अपरीग्रह म्हणजे द्रव्य संग्रह न करणे आणि ब्रम्हचर्य म्हणजे कामवासना न बाळगणे.
जैन धर्माचा सर्वव्यापी “णमोकार मंत्र” विश्वातील सर्व अरिहंतांना, सिद्ध जनांना, आचार्यांना, सर्व उपाध्याय, साधुंना नमन करणारा व जैन साधकाला विनयता, नम्रता शिकवणारा आहे. अशा या महान, वस्तुनिष्ठ विज्ञानवादी, विस्तृत विवेचन असलेल्या जैन धर्माची सर्व जगताला अतुलनीय भेट म्हणजे “अहिंसा” तत्वज्ञान. अनेक राष्ट्रांनी, महान व्यक्तींनी स्विकारलेले तत्वज्ञान म्हणजे अहिंसा, ज्याच्या आचरणाने प्रभावित होऊन एक ‘व्यक्ती “महात्मा” म्हणून सर्व जगात परिचीत आहे. अहिंसेचा पाया मानवी मनातील दया क्षमा करण्याची मानसिकता आहे. शारिरीक सामर्थ्यापेक्षा, सदसदविवेक बुद्धी व अंतरंगातल्या क्षमा शक्तीचा वापर करून अहिंसा प्रेमी जीव, हिंसक प्रवृत्तीचा प्रतिकार करू शकतो, हाच दृढ विश्वास अहिंसा तत्वाच्या पाठीशी आहे. हिंसक घटनेस हिंसकतेने उत्तर दिल्यास हिंसाचार वाढतो, तथापी तोच प्रतिकार अहिंसेने केला तर हिंसाचाराला आळा बसतो. क्षमा करण्याची सर्वोच्य भावना म्हणजे अहिंसा. “अहिंसा परमो धर्म” ही एक जीवन प्रणाली असून, अहिंसेचे उगमस्थान प्राणिमात्रा विषयी करुणा हे होय.
जैनांच्या “सामायिक” या दैनंदिन विधीमध्ये म्हणजेच सांसारीक विषय सोडून स्वतःच्या शुद्ध आत्म्यात एकाग्र होण्याच्या प्रयत्नाचे श्लोक आहेत.
समता सर्व भुतेषू, संयमे शुभभावना
आर्त रौद्र परित्याग स्तभ्दी सामायिक व्रतम.
अर्थात, मी समस्त जीवांच्या प्रति, समबुद्धी ठेवतो, संयमपूर्वक शुभ भाव ठेवतो व माझ्या आर्त, रौद्र या वृत्तींचा
त्याग करतो .
साम्यम सर्व भुतेषु वैर मम न केनचित
आशाः सर्वः परित्यज समाधी महिमाश्रये.
अर्थात मी सर्व जीवाशी साम्य धारण करतो, समता ठेवतो, माझे कोणाशीही वैर नाही व सर्व प्रकारच्या आशा सोडुन, शांततेचा आश्रय घेतो.
जैन तत्वज्ञान अतिशय व्यापक काल, द्रव्य, सम्यकत्व, कर्म, पाप पुण्य अशा विविध विषयांवर शिकवण, ज्ञान व विचार देतो. केवळ वरील अहिंसेचा श्रेष्ठ विचार, समतेचा संदेश विश्वातील प्रत्येक जीवाने अंगिकारला तरी जागतिक समस्या “दहशतवाद” निर्मुलनाची प्रक्रिया सुरु होईल. जैन तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार, व्यापक स्वरुपात, सोप्या भाषेत जगासमोर आला तर अनेकांचे मनोपरीवर्तन होऊन समता, विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होईल आणि दहशतवाद निर्मुलनास अत्यंत उपयुक्त ठरेल यात तीळमात्र शंका नाही तर दृढविश्वास आहे.
“कौन कहता है, आसमां को छेद नहीं होगा,
एक पत्थर तो तबियतसे उछालो यारों”